|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
' आपण अंतकाळी कसे जाणले जाता ? ' असा अर्जुनाचा प्रश्न होता. याचे उत्तर भगवंत देत आहेत. -
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम |
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: || गीता अ. ८-५ ||
जो मनुष्य अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीर सोडून जातो तो माझ्या साक्षात स्वरूपालाच प्राप्त होतो, यात काहीच शंका नाही.
श्रीमहाराजांचा स्वभाव ईश्वररूप झालेला होता. ध्यानी, मनी, स्वप्नी रामरायाचे स्मरण होत होते. अंतकाली ' श्रीराम, श्रीराम ' असे स्मरण करत अत्यंत प्रसन्न चित्ताने श्रीमहाराजांनी प्राण सोडला.
देहत्याग करताना जो भाव मनात असेल, त्या भावालाच मानव प्राप्त होतो, हे भगवंत आता सांगतात,
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम |
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: || गीता अ. ८-६ ||
हे कुंतीपुत्र अर्जुन ! मनुष्य अंतकाळी ज्या ज्या काही भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याच भावाला, सदा त्या भावाचेच चिंतन करीत असल्यामुळे प्राप्त होतो.
भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्रीमहाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले; नामाचे महत्त्वाचे जन्मभर त्यांनी गायन केले; आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले. श्रीमहाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले , कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले. कायावाचामनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही. श्रीमहाराज अंतकाळीही श्रीरामभावनाभावित होत ब्रह्मभावात मिळून गेले.
महाप्रस्थान -
श्रीमहाराजांनी आपण इहलोक सोडून लवकरच प्रस्थान करणार याची कल्पना श्रीब्रह्मानंदांना पंढरपूर मुक्कामी त्यांचा निरोप घेतेवेळी दिली. दोघे एकांतात दीड तास बोलत होते. आपल्या माघारी गोंदवले संस्थानाच्या व्यवस्थेबद्दल बोलणे झाले असावे. गोंदवले संस्थानाच्या व्यवस्थेबद्दल त्यावर पंच नेमून पंचांना श्रीमहाराजांनी सविस्तर सूचना केल्या होत्या. तसेच मृत्युपत्रात आपल्या मालकीच्या स्थावर- जंगम मालमत्तेचीही योग्य ती व्यवस्था लिहून ठेवली. आपली सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली. आपल्यामागे अन्नदान निरंतर चालावे हाही एक हेतू या व्यवस्थेमागे होता.
या सुमारास भेटावयास आलेल्या मंडळींना श्रीमहाराज आग्रहाने एकदोन दिवस जास्त ठेवून घेत; आणि त्यांना निरोप देताना सांगत की, ' मी आता लवकरच नैमिष्यारण्यात जाणार आहे. मी सांगितलेले नाम तेवढे विसरू नका. त्यांतच कल्याण आहे ! ' कधी कधी श्रीमहाराज म्हणायचे, ' पहा बरं ! मी पक्ष्यासारखा केव्हा उडून जाईन त्याचा नेम नाही. नामाला लागा. ' स्वत:च्या अंतकालाबद्दल ते देत असलेल्या सूचना लोक फार गंभीरपणे घेत नसत.
सन १९१३ साली मार्गशीर्ष पौर्णिमेचा दत्तजयंतीचा उत्सव ही श्रीमहाराजांची शेवटचीच दत्तजयंती ठरली. त्यादिवशी दम्याचा फार जोर होता. दत्तजन्म झाल्यानंतर दत्तमंदिराचे पुजारी बाळंभट यांना श्रीमहाराज म्हणाले, ' कुणास ठाऊक मी किती दिवस आहे ! रामाने बोलावले की मी जाणार ! '
श्रीमहाराज थकत चालले होते. शक्ती क्षीण झाली होती. डॉ. गोपाळराव जोशी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करीत होते. त्यांनी श्रीमहाराजांचे हृदय तपसले असता त्यांची अवस्था फारच वाईट असल्याचे आढळले तरीही चार- आठ दिवसात ते देह ठेवतील असे त्यांनाही वाटले नव्हते. पण याला कारणही तसेच होते. दोन दिवसच आधी, मस्ती करणाऱ्या बत्ताशा घोड्याला श्रीमहाराजांनी चांगला पाच- दहा मैल रपेट करून आणला तेव्हा कोठे तो शांत झाला. त्याला पाहून ते बोलले, ' मुक्या प्राण्याला देखील शेवटी सेवा घ्यावी अशी इच्छा झाली. राम कसा सगळीकडे भरलेला आहे. ' श्रीमहाराजांचा आहार कमी झाला होता. दमा फार जोर करू लागला होता. पायावर पुष्कळ सूज असून उभे राहण्यास त्यांना फार त्रास होई.
याच सुमारास डॉ. कुर्तकोटी श्रीमहाराजांना भेटावयास आले होते. दोघांचे एकांतात तासभर बोलणे झाले. ' माझा आता भरवसा नाही. म्हणून माझ्यामागे तुम्ही इथे राहून लोकांना नामस्मरण करायला लावावे. ' असे त्यांना सांगितले . दुसरे दिवशी निरोप घेताना ते नमस्कार करीत असता श्रीमहाराज इतकेच म्हणाले, 'नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात; आपण स्वत:देखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे, आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले काम चालू ठेवावे. राम तुमचे कल्याण करील.'
अखेरचे पाच दिवस-
बुधवार, १७ डिसेंबर १९१३ - मार्गशीर्ष महिन्यात म्हसवडला नागोबाची यात्रा भरते व तेथे पुष्कळ गायी विकण्यास येतात. गायींना कसायाच्या हातून सोडविण्यासाठी पुरेसे पैसे बरोबर घेऊन श्रीमहाराज म्हसवडला निघाले. जाता जाता ते बोलले कि, ' ही आता अखेरची सेवा आहे ! ' त्यांनी पुष्कळ गायी कसायांच्या हातून सोडविल्या. याच यात्रेत श्रीमहाराजांना एक बैल पसंत पडला. त्याची किंमत विचारीत असता तेथील लोक म्हणाले, ' महाराज, हा बैल चांगला नाही. याची खोड वाईट आहे. हा ज्याच्या घरी जातो त्याची हानी करतो. ' हे ऐकून श्रीमहाराज हंसले व म्हणाले, ' तुम्ही सांगता हे खरे असेल, पण मी आहे गोसावी ! माझी हानी हा काय करणार ? मीच याला विकत घेतो; कारण हा गरीब लोकांची उगीच हानी करतो. हा माझ्या उपयोगी पडेल !' त्यांनी तो बैल विकत घेतला. नंतर त्यांचे शिष्य दिवाणसाहेब यांचे घरी विश्रांती घेऊन ते गोंदवल्यास निघाले. दिवाणसाहेबांनी नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, ' दिवाणसाहेब, तुमची आमची हीच अखेरची भेट आहे. नामाला विसरू नका. जेथे नाम तेथे मी आहे, हे ध्यानात वागवा ! '
गुरुवार, १८ डिसेंबर १९१३ - गुरुवारी सकाळी श्रीमहाराज शौचमुखमार्जन झाल्यावर श्रीरामरायाच्या दर्शनास आले. दम्यामुळे रात्रभर उभे राहून काढल्याने त्यांच्या पायाची सूज वाढली होती. चालण्यास श्रम होत होते. श्रीमहाराज मंदिरात आसनस्थ होताच दहापंधरा मिनिटात स्त्रीपुरुषांनी सर्व मंदिर भरून गेले. गप्पा चालाव्यात अशा स्वरात श्रीमहाराज बोलले, ' बघा रे बुवा ! आमची जागा फार दिवस रिकामी पडली आहे, म्हणून आता रामाची चिट्ठी आली आहे. मला जाणे जरूर आहे. तुम्ही आनंदाने निरोप द्या. भगवंताच्या नामाला विसरू नका हेच माझे शेवटचे सांगणे आहे.'
कितीतरी दिवसांपासून ते आपल्या जाण्याविषयी सर्वांना स्पष्ट सांगत होते, परंतु कोणाला ते खरे वाटलेच नाही. श्रीमहाराज स्वत:च्या जाण्याविषयी सांगताना इतके हंसत खेळत बोलत कि ऐकणाऱ्याला त्यांच्या शब्दांचे खरे महत्त्व वाटतच नसे. गुरुवारी सकाळी त्यांनी आपण लवकरच जाणार असे सर्व लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितले.त्यानंतर दीड तास निरुपण झाले. श्रीमहाराज म्हणाले, ' जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे दृश्यपणात असताना स्वतंत्र नसते; ते भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह हा दृश्य आहे. अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साधते; म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. हि युक्ती ज्याला साधली त्याला सुखदु:खाची बाधा उरली नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूर आहे. उगीच भलत्याच सांगण्याला भुलू नये आणि अनीती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे, आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील असे मी सर्वांना वचन देतो.'
त्या दिवशी संध्याकाळी श्रीमहाराज धाकट्या राममंदिराकडे गेले. रामाचे दर्शन घेतल्यावर, जवळच राहणाऱ्या भाऊसाहेब केतकर यांच्या बिऱ्हाडी गेले. श्रीमहाराज आपल्याकडे एकटेच आलेले पाहून त्या उभयतांना फार आनंद झाला. बसता बसता श्रीमहाराज भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणाले, ' बाई मला फार भूक लागली आहे, काय असेल ते खायला द्या.' मुलांच्यासाठी भात टाकलेला होता. भात झाल्यावर सौ.बाईंनी तव्यावर थोडे पिठले टाकले आणि भाऊसाहेब व श्रीमहाराज असे दोघेजण जेवावयास बसले. जेवण चालू असता भाऊसाहेब सहज म्हणाले ' आपण थोडी विश्रांती घ्या म्हणजे जरा बरे वाटेल.' यावर श्रीमहाराज म्हणाले, 'भाऊसाहेब, या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंगजिऱ्याचे गिऱ्हाईक आहेत, केशरकस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणे कठीण जाते, म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे. भाऊसाहेब, मला या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिले आहे. देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचे सुख वा दु:ख सारखेच मानावे !' जेवण झाल्यावर पाचदहा मिनिटे विश्रांती घेऊन श्रीमहाराज परत मोठ्या राममंदिराकडे गेले.
शुक्रवार, १९ डिसेंबर १९१३ - शुक्रवारी श्रीमहाराज शाळेचे इन्स्पेक्टर काळे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी दुपारी बारा वाजता जेवावयास गेले. श्रीमहाराजांच्या बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते. दोघेजण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले. जवळ इतर कोणी नाही असे पाहून श्रीमहाराज भाऊसाहेबांना म्हणाले, ' भाऊसाहेब, मला आता जाणे जरूर आहे. मी सोमवारी जाणार ! ' हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला. जेवण आटोपून श्रीमहाराज मंदिरात परत आले. संध्याकाळी दम्याचा त्रास वाढला. त्याचवेळी समर्थांचा प्रसाद म्हणून एका कऱ्हाडच्या माणसाने श्रीमहाराजांना नवीन कफनी दिली. त्याच्या आग्रहाखातर श्रीमहाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले, व लगेच भजनाला उभे राहिले. पायावर फार सूज असल्यामुळे त्यांना फार वेळ उभे राहवत नव्हते, म्हणून कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहात आणि निरुपण सांगत. त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत भजन व निरुपण झाले.
शनिवार, २० डिसेंबर १९१३ - श्रीमहाराजांचे चुलते संन्यासी होते. त्यांचे वृंदावन धाकट्या राममंदिरापाशी आहे. शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती म्हणून श्रीमहाराज वृन्दावनाकडे आले होते. त्याच रात्री नेहमीप्रमाणे श्रीमहाराज भजनास उभे राहिले. मंदिरात खूप गर्दी झाली. सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते, पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा व एकाच पायावर उभे रहावे, त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभे रहावे, याप्रमाणे त्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत भजन केले. निरुपणामध्ये देहाचे अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचे महत्त्व, सगुणाचे प्रेम, संतांच्या संगतीचे श्रेष्ठपण, याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितले.
रविवार, २१ डिसेंबर १९१३ - रविवार उजाडताच श्रीमहाराजांच्या सकट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरु झाले.
संध्याकाळी पाच वाजता श्रीमहाराज गोठ्यावर गेले. बापूसाहेब खरे यांची सून न्यूमोनियाने आजारी होती, तिला तेथेच ठेवली होती. डॉ. जोशी तिची शुश्रुषा करीत होते. श्रीमहाराज तिच्याजवळ गेले व ' बरे वाटेल, काळजी करू नकोस. ' असा तिला धीर देत आपण गोठ्यात गेले. गोठ्यामध्ये गायी, वासरे मिळून पाऊणशे जनावरे होती. सर्वांना नीट पाहून तेथे गवत पडले होते ते साफ करण्यास भवानरावास सांगितले. ती जागा स्वच्छ करून घेऊन तेथे ठेवलेल्या खुर्चीवर बसले. गवताच्या गंजी घेतल्या होत्या त्याची विशेष काळजी घेण्यास भवानरावाला सांगून श्रीमहाराज सहजपणे बोलले, ' ही जागा फार छान आहे. इथे कायमचे रहावे असे मला फार वाटते.' श्रीमहाराजांना गायींचे विलक्षण प्रेम होते. कधी कधी गायींचा गोठा ते स्वत: साफ करीत. कधी कधी तेथेच स्वयंपाक करवून जेवण करीत.
अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला म्हणून श्रीमहाराज मंदिरात आले. रात्रीचा फराळ झाल्यावर श्रीमहाराज थोडी विश्रांती घेऊन भजनाला उभे राहिले. नऊ वाजताच सर्व मंदिर गच्च भरून गेले. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता. त्यांचे ते शेवटचे भजन व निरुपण होते. श्रीमहाराज सुरुवातीला मागे पुढे हलत होते, पण दहा वाजल्यानंतर एके ठिकाणी उभे राहूनच ते भजनात रंगून गेले होते. उभे राहण्याचे कष्ट सहन करीतच भजन चालू होते. सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले. एक अभंग असा सांगितला -
शरण शरण रघुनाथा | भक्तपालन करी आतां || १ ||
श्रीरामा निरोप द्यावा | देई अखंडित सेवा || २ ||
ब्रीद राखी रघुराज | हेची सांगतसे आज || ३ ||
दिनदासाची विनवणी | आज्ञा द्यावी चक्रपाणी || ४ ||
त्यानंतर नाममहात्म्य सांगणारा अभंग त्यांनी म्हटला. श्रीमहाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टाहास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. त्या दिवशीच्या भजनात आणि निरुपणात एक विशेष भावपूर्ण रस ओसंडत होता की ऐकणाऱ्या सर्वांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. भजन होता होता रात्रीचा एक वाजला. श्रीमहाराजांनी अभंग म्हटला -
सरली आयुष्याची गणना | आता येणे नाही पुन्हा ||१ ||
तुझ्या पायी मन राही | हेचि सुख आम्हा देई || २ ||
तुझ्या पायी पडली मिठी | आता जातो उठाउठी || ३ ||
दीनदास म्हणे रघुनाथा | आज्ञा द्यावी मज आता || ४ ||
श्रीरामरायाकडे पहात, हा अभंग म्हणताना श्रीमहाराजांच्या वाणीतून सगुण प्रेमाचा अमृतरस पाझरत होता. लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले -
बाळ गोपाळ लहान थोर | भाऊबंद वतनदार || १ ||
नाही झालो द्रव्यवान | जन्म घेऊनि झाला शीण || २ ||
काय दाखवू वदन | रामार्पण केला प्राण || ३ ||
आता नाही नाही धोका | राम नेईल परलोका || ४ ||
आज्ञा सकळ लोक | पाया पडतो मी रंक || ५ ||
आता पुन्हा नये गावा | दिनदासा कृपा ठेवा || ६ ||
आपण जाणार हे श्रीमहाराजांनी लोकांना जवळ जवळ स्पष्टच सांगितले. श्रीमहाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला. त्यांना मोठ्याने रडता येईना व दु:ख आतमध्ये सामावेना, पण तेथून उठून बाहेरही जाववेना. अखेर दीड वाजला तेव्हा श्रीमहाराजांनी सर्वांना नमस्कार केला, सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने बघितले, आणि अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा अभंग म्हटला -
भजनाचा शेवट आला | एकवेळ राम बोला || १ ||
आजि पुण्य पर्वकाळ | पुन: नाही ऐसी वेळ || २ ||
रामनाम वाचे बोला | आत्मसुखामाजी डोला || ३ ||
दीनदास सांगे निका | रामनाम स्वामी शिक्का || ४ ||
झाले ! श्रीमहाराजांचे शेवटचे भजन संपले.
सोमवार, २२ डिसेंबर १९१३ - श्रीमहाराजांनी २२ डिसेंबर चा सूर्योदय पहिला नाही. निर्वाणीचे अभंग झाले, नाम महात्म्य सांगणारे निरुपण संपले, रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा दीड वाजला होता. रामाची आरती झाल्यावर श्रीमहाराज आसनस्थ झाले. ते जरा थकलेले दिसत होते. परगावहून आलेल्या दर्शनार्थींशी प्रसन्नतेने बोलत होते. रात्रीचे दोन वाजले. सर्वांना निजावयास जाण्यास सांगून आपण स्वत: आपल्या खोलीमध्ये आले. काही मोजकी मंडळी त्यांच्या बरोबर होती. दहा मिनिटे तक्क्याला टेकून बसले व नंतर म्हणाले, ' मी जरा आडवा होतो.' असे म्हणून ते अंथरुणावर लवंडले. ते उताणेच निजले होते.त्यांचा चेहरा फारच शांत व प्रसन्न दिसत होता. महाप्रस्थानाची वेळ जवळ येत होती. चार वाजण्याच्या सुमारास ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि ' श्रीराम, श्रीराम ' असा मधुर प्रेममय शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडला. पाच मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व ते उठून बसले.
खोलीमध्ये जागत बसलेल्या हरिपंत मास्तर, वामनराव ज्ञानेश्वरी, अम्मा अशा सर्वांवर प्रेमाची, कृपेची नजर फिरवून श्रीमहाराजांनी डोळे झांकले. डोळे मिटलेले सिद्धासनातील श्रीमहाराज एखाद्या योग्यासारखे दिसत होते. सव्वापाच वाजता त्यांची समाधी उतरली व त्यांनी डोळे उघडले. शौचमुखमार्जन उरकून घेण्यासाठी सर्वांना सांगितले व वामनरावांच्या बरोबर स्वत: बाहेर गेले. पंधरा मिनिटांनी ते परत आले. श्रीमहाराजांनी अंगात कफनी, डोक्याला उपरणे, आणि पायात वहाणा घातल्या होत्या. हातपाय धुवून ते रामासमोर आले, त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व म्हणाले, ' माझ्या माणसांना सांभाळ. ' शेजारीच अम्मा उभी होती. खोलीत जाता जाता तिला ते म्हणाले, ' अम्मा ! रामरायाची ही अखेरची सेवा बरे का ! ' खोलीत आल्यावर पुन्हा ते पलंगावर आसन घालून बसले. इतक्यात वामनरावांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. आपला उजवा हात वामनरावांच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पहात श्रीमहाराज म्हणाले,
' जेथे नाम तेथे माझे प्राण | ही सांभाळावी खूण ||
इतरांनीही त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला, प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिले आणि श्रीमहाराजांनी डोळे झांकून घेतले. त्यावेळी ' अमृत ' नावाची उत्तम घटका सुरु होती. त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला, म्हणून जेरे मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणे धाडले. डॉ.जोशी यांच्याकडेही सांगावा गेला. पण ते दोघे येण्याच्या अगोदरच श्रीमहाराजांनी आपली प्राणज्योत अनंतात विलीन केली. श्रीमहाराजांनी महाप्रस्थान केले होते. अशा रीतीने, सहाला दहा मिनिटे कमी असताना, जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडून वर येऊ पहात असताना, गोंदवल्याचा हा अध्यात्मसूर्य मावळला, आणि तो कायमचाच मावळला. राम-कृष्ण अवतार परंपरेतील ' नामावतार ' आपले अवतार कार्य संपवून महाप्रस्थान करता झाला.एका अतिदिव्य जीवन चरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला. गुरुशोधार्थ, नैमिष्यारण्यात जाण्यासाठी, काशीयात्रेला जाण्यासाठी, राममंदिराच्या स्थापनेसाठी, श्रीमहाराजांना यापूर्वी गोंदवल्याहून प्रस्थान करावे लागले पण पुन्हा माघारी गोंदवल्यास येणे झाले. मात्र आता श्रीमहाराज जेथून आले तेथे जाण्यासाठी महाप्रस्थान करते झाले !
देहातून प्राण बाहेर पडल्यावर वामनरावांनी श्रीमहाराजांना कुशीत धरले होते. इतक्यात भाऊसाहेब तेथे आले. तो प्रसंग पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. डॉ.जोशी आले. त्यांनी कानाला नळी लावून छाती बघितली, नाडी बघितली, आणि तोंडाने शब्द न बोलता नुसत्या हातांनी ' सगळे संपले ' म्हणून सांगितले. श्रीमहाराज आता पुन्हा जागे होणार नाहीत हे समजल्यावर सर्व मंडळींमध्ये दु:खाचा डोंब उसळला ! वाऱ्याच्या वेगाने ही वार्ता सगळीकडे पसरली. लहान मुले, बायका, पुरुष, सर्वजण त्या निष्प्राण देहावर पडून ओक्साबोक्शी रडू लागले. श्रीआईसाहेबांना शोक अनावर झाला. आपला त्राता गेला, आपला आधार तुटला, आपला कैवारी नाहीसा झाला, आपला मायबाप हरपला, असे सर्वांना दिसून सगळीकडे ओके ओके, भकास वाटू लागले. भक्त मंडळीना एवढा आघात झाला की, त्यांची मती गुंग होऊन गेली.
श्रीमहाराजांचा चेहरा अत्यंत शांत व मुद्रा प्रसन्न असून त्यांच्या वदनमंडलावर मोठे तेज चढले होते. मृत्यूची कोणतीही चिन्हे त्यांच्या शरीरावर दिसत नसून ते स्वस्थ निजले आहेत असे पाहाणाऱ्याला वाटे. सर्वदूर निरोप गेले, तारा पाठविण्यात आल्या. सकाळी दहा वाजल्यापासून त्या महापुरुषाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या.
अप्पासाहेब भडगावकर तार मिळताच पंढरपूरहून त्याच रात्री गोंदवल्यास पोचले. श्रीब्रह्मानंदांची वाट बघावी असे सर्वानुमते ठरल्याने श्रीमहाराजांचे शरीर कडूलिंबाचा पाला घालून झांकून ठेवले. इकडे श्रीब्रह्मानंदांना हि बातमी कळताच ते मटकन खालीच बसले आणि एखाद्या लहान मुलासारखे मोठ्याने रडू लागले. शोक अनावर झाला. बेलधडीला जाण्यास निघालेले ते पुढे तीन दिवस कोठे तरी गुप्त झाले होते.
चहुकडून माणसे अंत्यदर्शनासाठी गोंदवलेस येत होती. सोमवारचा दिवस तर गेलाच, मंगळवारचा दिवस उजाडला तरी श्रीब्रह्मानंदांच्या येण्याचा संभव दिसेना. मग मात्र भाऊसाहेब केतकर यांनी पुढाकार घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. रविवारी संध्याकाळी श्रीमहाराज गोठ्यावर ज्या जागेवर बसले होते ती जागा दहनभूमी म्हणून ठरवली. मोठे शोभिवंत विमान करून त्यामध्ये त्यांना बसविले. कपाळाला बुक्का लावला. गळ्यात तुळशीचा मोठा हर घातला. त्यांची पूजा व आरती केली, आणि ' जानकी जीवन स्मरण जय जय राम ' म्हणून सर्वांनी विमान उचलले. ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम ' असे भजन करीत, गुलाल बुक्का आणि फुले उधळीत सर्वजण निघाले. गावातून मिरवीत विमान दहनभूमीवर आणले. जागा गोमयाने सारवून, रांगोळ्या घालून आणि केळीचे खुंट बांधून शृंगारली होती. तेथे आल्यानंतर थोडे भजन झाले. श्रीमहाराजांचा चुलत भाऊ श्रीहरी याने सर्व संस्कार यथासांग केले आणि शरीर चितेवर ठेवले. अग्निनारायणाने श्रीमहाराजांच्या शरीराला कवटाळले. दुपारी तीन वाजण्याची वेळ होती, आणि अग्नीच्या ज्वाळा भयंकर रूप घेऊन आकाशाकडे झेप घेत होत्या. साश्रू नयनांनी ' श्रीराम, श्रीराम ' असे म्हणत मोठ्या जड अंत:कारणाने लोकांनी निरोप दिला.
तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करून भरून ठेवण्यात आल्या. प्रयागला नेण्यासाठी हरिपंत मास्तर अस्थी घेऊन निघाले. त्यांचा वाटेत हर्दा येथे मुक्काम झाला. श्रीआनंदसागरांच्या अस्थी हर्दा येथे श्रीमहाराज प्रयागला जातील तेव्हा विसर्जित करतील म्हणून कपाटात ठेवल्या होत्या. पण तसे घडले नाही. त्याही अस्थी हरीपंतानी बरोबर घेतल्या. भय्यासाहेब इंदुरकर, कुंभोजकर, पटाईत मावशी, इंदूरची ती, मसुरीयादिन शिवमंगल, बाबूभट आदी सर्व मंडळी हरीपन्तांच्या बरोबर प्रयागला गेली व नामाच्या गजरात गुरु- शिष्याच्या अस्थी गंगेत विसर्जित झाल्या. ज्या देहाने असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला त्या देहाचे भौतिक अवशेष जरी नाहीसे झाले तरी तो नामरूपी ' चैतन्यस्पर्श ' आसमंतात भरून राहिलेला आहे !
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला |
ज्याने सदा वास नामात केला |
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती |
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||